वर्ध्यात वन विभागाच्या पथकाला विरोध; लाकूड वाहतूक करणारा ट्रक पेटवल्याचा आरोप!

कारवाईला अडथळा आणत वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वर्धा | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यात अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या वन विभागाच्या पथकाला विरोध करत शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तळेगाव–आर्वी मार्गावर वन विभागाने ताब्यात घेतलेला लाकूड वाहतूक करणारा ट्रक अडवून त्यावर पेट्रोल टाकत पेटवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तळेगाव श्याम पंत परिसरातील वर्धमनेरी भागात परवानगीविना लाकूड वाहतूक होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर वन विभागाचे पथक कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले. तपासणीदरम्यान वन विभागाने लाकूड वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला.
पुढील कारवाईसाठी हा ट्रक नेत असताना काही जणांनी ट्रक अडवून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विरोध केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकी देण्यात आली आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे.
याचदरम्यान ताब्यात घेतलेल्या ट्रकवर पेट्रोल टाकून तो पेटवून दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे वन विभागाच्या कारवाईदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी गजय लोंढाडे यांच्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अवैध लाकूड वाहतूक, शासकीय कामात अडथळा, धमकी तसेच इतर आरोपांप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोयर करीत आहेत. ट्रक पेटविण्याच्या घटनेमागील नेमके कारण, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि अवैध लाकूड वाहतुकीचे संपूर्ण प्रकरण तपासातून स्पष्ट होणार आहे.



