पावसाने दडी मारल्याने पिके वाळली; राजुरात सोयाबीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
४५ ते ५० दिवसांपासून पाऊस नसल्याचा दावा; पंचनामे, कोरडा दुष्काळ आणि हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. राजुरा परिसरात गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीनसह तूर, कापूस, उडीद आणि हळद या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.पिकांचे नुकसान झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वाखाली वाळलेल्या सोयाबीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यानंतर स्मशानभूमीत सोयाबीनचा प्रतिकात्मक अंत्यविधी करून शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांकडून विविध मागण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात तातडीने पिकांचे पंचनामे करावेत, कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत आणि पीक विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली.याशिवाय कृषी पंपांचे वीज बिल माफ करावे आणि शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावी, अशा मागण्याही आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.
