अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; धावडा गावात कांदा पीक उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

धावडा गावात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. भोकरदन तालुक्यातील या घटनेत कांदा पीक पूर्णपणे नष्ट झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
भोकरदन तालुक्यातील धावडा गावात काल अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने मोठे नुकसान केले. वादळी वाऱ्यांसह झालेल्या या गारपीटीमुळे शेतातील उभे पीक काही क्षणांतच जमीनदोस्त झाले.
शेतकरी अल्ताफ खान सरफराज खान यांच्या गट क्रमांक ३४ आणि ८० मधील कांदा पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. हे पीक उभे करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत, वेळ आणि पैसा खर्च केला होता. मात्र निसर्गाच्या या तडाख्याने सर्व काही एका क्षणात उद्ध्वस्त झाले.
या घटनेत अल्ताफ खान यांचे सुमारे २.५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. विशेष म्हणजे, रमजान महिन्याच्या अखेरीस ईदचा सण जवळ आला असताना घरात आनंदाऐवजी चिंता आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. “शेतकरी मरतोय, पण प्रशासन झोपेत आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
स्थानिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करून नुकसानाची नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
निसर्गाच्या या अनियमित बदलामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. वेळेत मदत न मिळाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



