एका रात्रीत २५ हेक्टर भातशेती चिखलाखाली! साकोलीत तलाव फुटला, शेतकऱ्यांची मदतीची आर्त हाक

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सुंदरी गावात मंगळवारी पहाटे घडलेल्या घटनेने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर एका खासगी तलावाचे तुळुंब फुटल्याने तलावातील पाण्याचा आणि गाळाचा प्रचंड लोंढा थेट भातशेतीत घुसला.
अवघ्या काही मिनिटांत सुमारे २० ते २५ हेक्टरवरील भातपीक चिखलाखाली गाडले गेले. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने रोवलेले भातपीक पूर्णपणे आडवे झाले असून अनेक ठिकाणी अजूनही पाणी साचलेले आहे.
यंदा पावसाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून, कृषी पंपाच्या मदतीने आणि रात्रंदिवस मेहनत करून भात लागवड केली होती. मात्र, पहाटेच्या या दुर्घटनेने त्यांची वर्षभराची मेहनत एका क्षणात उद्ध्वस्त झाली.
या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक कुटुंबांपुढे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि पंचनाम्याची प्रक्रिया अपेक्षित असून शेतकऱ्यांचे लक्ष आता शासकीय मदतीकडे लागले आहे.



