अमरावतीत शंभरहून अधिक कॉलन्यांवर पुराचे संकट! प्रशासनावर गंभीर आरोप, जनआंदोलनाचा इशारा

अमरावतीच्या पोटे रोड परिसरातील छत्रपती शिवाजी नगर आणि शेगाव-राहाटगाव प्रभाग क्रमांक १ मध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवरून वाद निर्माण झाला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोप केला आहे की, ज्या शेतजमिनीवर लेआउट विकसित करण्यात आले, त्या परिसरातील नैसर्गिक नाल्याचे आणि पोटखराब क्षेत्राचे योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे भविष्यात या भागातील शंभर ते दीडशे कॉलन्यांना पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांपासून या विषयाबाबत महानगरपालिका, नगर रचना विभाग, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागांना वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या काही कॉलन्यांमध्ये सुमारे तीन फूट पाणी साचत असून नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. पावसामुळे विषारी साप आणि विंचूंचा धोका वाढल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, प्रशासनाने नाल्याची रुंदी वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
या आरोपांबाबत संबंधित महानगरपालिका, नगर रचना विभाग आणि महसूल प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.



