शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक!

संभाजीनगर-जालना महामार्गावर रास्तारोको; खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेसने छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक भूमिका घेतली असून संभाजीनगर-जालना महामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडले आहे. गेल्या अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून कॅम्ब्रिज चौक परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात, यासाठी आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रोखून धरत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
रास्तारोकोमुळे संभाजीनगर-जालना मार्गावरील वाहतूक पूर्णपणे प्रभावित झाली असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
दरम्यान, प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत असून आंदोलन किती काळ सुरू राहणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.



