अमरावतीत उष्णतेचा पारा 44°C पार, दुपारपूर्वीच रस्ते ओस

अमरावती जिल्ह्यात सध्या उष्णतेचा अक्षरशः कहर सुरू आहे… तापमानाने 44 अंशांचा टप्पा ओलांडला असून नागरिक हैराण झाले आहेत…
विशेष म्हणजे बडनेरा शहरात दुपारपूर्वीच रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे…
अमरावती जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमान 44 अंशांच्या पुढे गेले आहे. कडक उन्हामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
बडनेरा शहरात सकाळी 11 वाजल्यापासूनच मुख्य रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून दुपारच्या वेळेत शहरात अत्यल्प वाहतूक दिसून येत आहे. उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे की अंगाची अक्षरशः लाही लाही होत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. अनेकांनी घरांवर ग्रीन नेट लावले असून पाण्याच्या टाक्यांनाही संरक्षणात्मक आवरण घातले आहे. दरम्यान, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि मजूर वर्गाला उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. उष्माघाताचा धोका वाढला असून आरोग्य तज्ज्ञांनी विशेष काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, दुपारी 11 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर संरक्षण वापरावे आणि लिंबूपाणी, ताक, ओआरएससारख्या द्रव पदार्थांचे सेवन करावे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
“उष्णतेचा वाढता कहर लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे…
अनावश्यक बाहेर पडणे टाळा आणि स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या…



