सांगली हादरलं! एका दिवसात ३ ठिकाणी निर्घृण हत्याकांड

सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या निर्घृण हत्यांच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. सलग घडलेल्या या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली शहरासह जत तालुक्यातील दोन वेगवेगळ्या भागांत या तीन हत्या घडल्या. सांगली शहरातील लक्ष्मी मंदिर परिसरात सौरभ पवार या गुन्हेगाराचा भररस्त्यात पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार करत खून करण्यात आला. या प्रकरणात शाहिद मुल्ला आणि आयान भिस्ती यांची नावे समोर आली असून पोलिसांनी शाहिद मुल्लाला अटक केली आहे.
दुसरी धक्कादायक घटना जत तालुक्यातील वळसंग येथे घडली. येथे एका महिलेवर आधी ऍसिड फेकण्यात आले आणि त्यानंतर तिचे डोके दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
तिसरी घटना जत तालुक्यातील बिळूर येथे घडली. सामायिक जमीन आणि विहिरीच्या वादातून श्रीधर येलगोंडा यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
या तिन्ही घटनांनंतर सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून तिन्ही प्रकरणांचा वेगाने तपास सुरू आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.



