citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

“लहान हातांची मोठी जाणीव!”यवतमाळमध्ये चिमुकल्यांकडून पक्ष्यांसाठी पाणीपात्र; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

यवतमाळमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आहे. वाढत्या उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येत असताना, लहान मुलांच्या सहभागातून पक्ष्यांसाठी पाणीपात्र तयार करून एक अनोखी जनजागृती करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे केवळ पक्ष्यांना दिलासा मिळत नाही, तर पुढच्या पिढीला पर्यावरणाचे महत्त्वही शिकवले जात आहे.

यवतमाळ शहरातील नारंगी नगर परिसरातील गायत्री माता मंदिराजवळ पर्यावरण संवर्धन आणि पक्षी संरक्षणासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या तापमानामुळे आणि पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांच्या कमतरतेमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, त्यांच्या संरक्षणासाठी स्थानिक पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत टाकाऊ मातीपासून पक्ष्यांसाठी विशेष पाणीपात्र तयार करण्यात आले असून त्याला “जाणीव” असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांचा यात सक्रिय सहभाग. चिमुकल्यांनी स्वतःहून पाणीपात्र तयार करत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली, आणि याच माध्यमातून त्यांच्यात निसर्गाविषयी प्रेम व जबाबदारीची भावना रुजवण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात पाणीपात्रांची निर्मिती करून ती विविध ठिकाणी ठेवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संस्थेच्या सदस्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घरातील टाकाऊ माती, भांडी किंवा वेस्ट मटेरियल उपलब्ध असल्यास ते दान करावे, जेणेकरून अधिकाधिक पाणीपात्र तयार करून पक्ष्यांना दिलासा देता येईल.

या उपक्रमात संदीप भाऊ बेलखेडे, सर्पमित्र दिनेश तिवाडे, लकी घरत आणि पर्यावरणप्रेमी राहुल भाऊ दाभाडकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची गरज काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

उन्हाळ्याच्या झळा केवळ माणसांनाच नव्हे, तर मुक्या जीवांनाही सहन कराव्या लागतात. अशा वेळी पक्ष्यांसाठी पाण्याची छोटीशी सोयही त्यांच्यासाठी जीवनदायी ठरू शकते. यवतमाळमधील हा उपक्रम केवळ पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नाही, तर समाजाला संवेदनशीलतेची आणि सहजीवनाची शिकवणही देतो.

निसर्गाशी नातं जपा…
घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा झाडाखाली एक पाणीपात्र ठेवा…
कारण प्रत्येक थेंब कुणाच्यातरी जीवासाठी अमृत ठरू शकतो…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button