बुलढाण्यात माजी राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ; बलात्कार प्रकरणांवरील मागणीवरून राज्यभरात संताप

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथून एक अत्यंत वादग्रस्त आणि संवेदनशील प्रकरण समोर आले आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे पाठवलेल्या निवेदनामुळे राज्यभरात मोठी चर्चा आणि संताप व्यक्त होत आहे.
सुबोध सावजी यांनी आपल्या निवेदनात अशी मागणी केली आहे की, “स्वतःहून बलात्कार करवून घेणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांची नावे, फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक करावेत.” या मागणीमुळे केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरात वादंग निर्माण झाला आहे.
सावजी यांनी बलात्काराचे दोन प्रकार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, एक प्रकार म्हणजे जबरदस्तीने होणारा बलात्कार, तर दुसरा प्रकार म्हणजे स्वार्थ, पैसा किंवा इतर कारणांसाठी “स्वतःहून करवून घेतलेला” बलात्कार. जबरदस्तीच्या प्रकरणात पीडितेची ओळख गुप्त ठेवणे योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, “स्वार्थासाठी” असे करणाऱ्या महिलांना समाजासमोर आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
याशिवाय, अशा महिलांना “व्यभिचारी” संबोधत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही सावजी यांनी केली आहे. “अशा महिलांची नावे आणि फोटो जाहीर केल्यास इतर महिलाही असे वागणार नाहीत आणि खोट्या आरोपांना आळा बसेल,” असा दावा त्यांनी केला आहे.
या वक्तव्यानंतर अनेक सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारतीय कायद्यानुसार बलात्कार पीडितेची ओळख उघड करणे गुन्हा मानला जातो. तसेच, कोणत्याही महिलेला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी सार्वजनिकपणे आरोपी ठरवणे किंवा तिची माहिती जाहीर करणे हेही कायदेशीरदृष्ट्या वादग्रस्त ठरू शकते.
या पार्श्वभूमीवर महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञांकडून सावजी यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेकांच्या मते, अशा प्रकारची वक्तव्ये केल्याने खऱ्या पीडित महिलांमध्ये भीती निर्माण होऊ शकते आणि त्या तक्रार करण्यापासून परावृत्त होऊ शकतात.
यापूर्वीही नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात सुबोध सावजी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून आपली भूमिका मांडली होती. आता पुन्हा एकदा राज्यपालांना पत्र पाठवत त्यांनी ही मागणी केल्याने बुलढाणा जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.



