जालन्यात अकरावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप; बिहारच्या तरुणाला अटक

जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, अकरावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी बिहारमधील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल अन्सारी नावाच्या तरुणाने संबंधित विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर आत्महत्येची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तिची ओळख लपवण्यासाठी तिला बुरखा घालून स्वतःच्या घरी नेत असे. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी जालना पोलिसांनी साहिल अन्सारी या आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी तिची ओळख लपवण्यासाठी रस्त्यावर येताना-जाता तिला बुरखा घालण्यास भाग पाडत होता. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.
दरम्यान, राज्यात याआधी समोर आलेल्या काही गंभीर प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.



