तिरुपतीत जमिनीच्या वादातून थरारक हत्या; संतप्त नातेवाईकांनी आरोपीचे घर पेटवले

आंध्र प्रदेशातील तिरुपती ग्रामीण भागात जुन्या जमिनीच्या वादातून एक थरारक घटना घडली आहे. आदापरेड्डीपल्ले गावात दोन कुटुंबांमधील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपीचे घर आणि दुचाकी पेटवून दिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बी. राहुल रेड्डी आणि अमरनाथ रेड्डी या दोन कुटुंबांमध्ये १० अंका म्हणजेच सुमारे ३६० चौरस फूट जमिनीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. बुधवारी रात्री हा वाद टोकाला गेला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल रेड्डी हा थेट अमरनाथ रेड्डी यांच्या घरी गेला आणि धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून हत्या केली. हल्ल्यानंतर अमरनाथ यांच्या कुटुंबीयांना काही समजण्याआधीच राहुल रेड्डी घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच अमरनाथ रेड्डी यांचे नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी राहुल रेड्डीच्या घराकडे धाव घेतली. मात्र त्यावेळी घर बंद असल्याने त्यांनी घराची तोडफोड केली आणि घरासह बाहेर उभी असलेली दुचाकी पेटवून दिली.
घटनेची माहिती मिळताच एमआर पल्ली पोलीस तातडीने गावात दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत गावात बंदोबस्त वाढवला. अमरनाथ रेड्डी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, राहुल रेड्डी आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे. ते सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे आदापरेड्डीपल्ले गावात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, जुन्या जमिनीच्या वादातून पुन्हा एकदा हिंसाचाराचे भीषण रूप समोर आले आहे.



