यवतमाळमध्ये संतप्त ग्रामस्थांचा आंदोलन पेटला – “बेईमान” लिहून सरपंचासह घागर मोर्चा!

यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील सावर गावात तीव्र पाणीटंचाईने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट सरपंचाच्या कपड्यावर ‘बेईमान’ असे लिहून त्याला दोरीने बांधले आणि उपविभागीय कार्यालयावर घागर मोर्चा काढला. गेल्या कित्येक वर्षांपासून गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज आणि निवेदने दिली, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. शेवटी संतप्त ग्रामस्थांनी हा आक्रमक पवित्रा घेत सरपंचासह प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
यवतमाळ जिल्ह्यातील सावर गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. गावातील महिलांना दिवसाला मैलोनमैल पाणी भरण्यासाठी जावे लागते. शासनाने जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना जाहीर केली होती, मात्र अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
गावकऱ्यांनी सरपंचाच्या निष्क्रीय भूमिकेचा निषेध नोंदवत त्याच्या कपड्यांवर ‘बेईमान’ असे लिहिले आणि दोरीने बांधून मोर्चात सहभागी करून घेतले. हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर काढण्यात आला, जिथे ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सावर गावातील ग्रामस्थांनी घेतलेला हा आक्रमक पवित्रा प्रशासनासाठी मोठा इशारा आहे. वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांनी आज संतापाचा उद्रेक केला. आता प्रशासन याची दखल घेणार का? पाणीटंचाईवर काही ठोस उपाय केले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



