सूर्यापेटमध्ये १३ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की पित्याने घडवला खून?

तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यातील हुजूरनगर येथे १३ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार्तिक असे मृत मुलाचे नाव असून, त्याचा मृतदेह घरातील खाटेवर गळ्यावर खुणांसह आढळून आला. या घटनेनंतर आत्महत्या की खून, याबाबत वेगवेगळे दावे समोर आल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकचा मृतदेह रविवारी सकाळी घरातील खाटेवर आढळून आला. गळ्यावर स्पष्ट खुणा असल्याने सुरुवातीला मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली. कार्तिकचे वडील कोटेश्वर राव यांनी सुरुवातीला नातेवाईकांना मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले.
मात्र या घटनेला वेगळे वळण तेव्हा लागले, जेव्हा कार्तिकची आई विजया यांनी थेट आपल्या पतीवरच मुलाच्या खुनाचा आरोप केला. विजया यांच्या म्हणण्यानुसार, कौटुंबिक वादातून कोटेश्वर राव यांनी मुलाचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर त्याला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, कोटेश्वर राव आणि विजया यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. सुमारे १५ वर्षांपूर्वी विवाह झालेल्या या दाम्पत्यात जवळपास दहा वर्षांपासून मतभेद होते आणि दोघे वेगळे राहत होते. विजया आपल्या मुलासह हुजूरनगर येथील माहेरी राहत होत्या. काही महिन्यांपूर्वी कोटेश्वर राव पुन्हा त्याच घरात राहायला आले होते आणि भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, कोटेश्वर राव हे विजया यांच्यावर त्यांच्या मूळ गावी इब्राहिमपट्टणम येथे जाण्यासाठी दबाव टाकत होते. मात्र विजया यांनी त्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद अधिकच वाढला होता. या पार्श्वभूमीवरच हा प्रकार घडल्याचा आरोप विजया यांनी केला आहे.
आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
१३ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू… आईचा थेट पतीवर खुनाचा आरोप… आणि आत्महत्येचा बनाव केल्याचा संशय… या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा आता पोस्टमॉर्टम अहवाल आणि पोलीस तपासातूनच होणार आहे.



