नांदेडमध्ये मुसळधार पाऊस! आसना नदीला यंदाचा पहिला पूर, किनवटमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला

नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर चांगल्या पावसाची नोंद झाली असून नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच आसना नदीला मोठा पूर आला आहे. तसेच पैनगंगा नदीसह जिल्ह्यातील अनेक लहान-मोठ्या नद्यांनाही पूर आल्याने जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी काही भागांमध्ये नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका किनवट तालुक्याला बसला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून काही ठिकाणी घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
दरम्यान, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आजही नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी विनाकारण नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्यात जाऊ नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



