अमरावती महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात; महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण, स्वच्छता व विकासाचा संदेश

अमरावती महानगरपालिकेत आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देत यावेळी नागरिकांना एकात्मता, स्वच्छता आणि विकासाचा संदेश देण्यात आला.
१ मे २०२६ रोजी सकाळी नेमके ७ वाजून १५ मिनिटांनी अमरावती महानगरपालिकेच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
ध्वजारोहणानंतर महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. १ मे १९६० हा दिवस केवळ राज्य निर्मितीचा दिवस नसून, महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि एकतेचा अभिमानाचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान विभूतींच्या विचारांनी महाराष्ट्र समृद्ध झाला असून, त्यांच्या आदर्शांवर चालत समाज विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन महापौरांनी केले.
यावेळी जनगणनेतील Self Enumeration उपक्रमाचा विशेष उल्लेख करत नागरिकांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात वंदे मातरम आणि महाराष्ट्र राज्यगीताचे सादरीकरण करण्यात आले. वडरपुरा येथील विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने राष्ट्रगीत सादर करत वातावरण देशभक्तीने भारावून टाकले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र दिनाच्या या सोहळ्यातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक ऐक्य आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश देण्यात आला. मात्र हा संदेश केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता, प्रत्येक नागरिकाने तो आपल्या दैनंदिन आयुष्यात आचरणात आणणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
स्वच्छ, सुंदर आणि प्रगत अमरावती घडवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा असल्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.



