सिन्नरमध्ये भीषण अपघात: ट्रकच्या धडकेत पिकअपला आग, चौघांचा होरपळून मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. पंचाळे गावाजवळ भरधाव ट्रकने पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने पिकअपने पेट घेतला आणि त्यात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ट्रक आणि पिकअप यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर पिकअपने अचानक आग पकडली. या भीषण आगीत तिघांना वाहनातून बाहेर पडता आले नाही, त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर एका महिलेला धडकेदरम्यान बाहेर फेकले गेले आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
हे सर्व जण जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमावरून परत येत होते, मात्र नियतीने त्यांच्यावर काळाचा घाला घातला.
अपघाताची माहिती मिळताच सिन्नर नगरपालिकेचे अग्निशमन दल, एमआयडीसी अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये:
- किरण रवींद्र मोरे (२५)
- शुभम गणेश नवले (२२)
- रिंकू शुभम नवले (१९)
- मिराबाई विश्वनाथ गांगुर्डे (३५)
तर सचिन गणेश नवले आणि सुनिता गणेश नवले हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मृत सर्वजण पंचाळे गावातील रहिवासी असून, या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत दुःखद वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.



