अमरावती जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उच्छाद; 10 महिन्यांत 9,270 नागरिकांना चावा

अमरावती जिल्ह्यात मोकाट भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, मनपा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आकडेवारीमुळे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या केवळ 10 महिन्यांत मनपा हद्दीत 1,838 तर संपूर्ण जिल्ह्यात तब्बल 9,270 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वाढत्या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून, उपचारासाठी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत आहे. विशेषतः Anti-Rabies Vaccine (ARV) काउंटरवर रांगा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, ज्यामुळे कर्मचारी वर्गावर ताण निर्माण झाला आहे.
निवासी परिसर, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, तसेच शाळा–कॉलेज परिसरातही मोकाट कुत्र्यांचे टोळके मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहेत. मनपाच्या नोंदीनुसार भटक्या कुत्र्यांच्या चाव्याच्या तक्रारी मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाल्या आहेत.
मनपा आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी सांगितले की,
“नागरिकांनी कुत्र्यांच्या चाव्याकडे दुर्लक्ष करू नये. तात्काळ रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घ्यावे. उपचार उशिरा घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.”
मोकाट कुत्र्यांची अनियंत्रित संख्या, मनपाच्या कार्यवाहीतील ढिलाई आणि नागरिकांच्या वाढत्या चिंतेमुळे हा मुद्दा गंभीर सार्वजनिक आरोग्य संकट म्हणून उदयास येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.



