आर.ओ. प्लांट बंद, जुगाराचे अड्डे आणि नागरिकांचे हाल, कामरगाव ग्रामपंचायतीची नाकर्ती

वाशिम –वाशिम जिल्ह्यातील कामरगाव ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा आता जनतेच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. दिवाळी सारख्या मोठ्या सणाच्या आधीपासूनच गावातील आर.ओ. प्लांट बंद आहे. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील लहान मुलांना पाण्याच्या बदलामुळे ताप, सर्दी, खोकला या आजारांनी ग्रासले आहे. रामनगर गार्डन परिसरातील आर.ओ. प्लांटवर लाखो रुपये खर्च करून देखील, तो अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. तो प्लांट आता कचऱ्यात पडलेला असून, त्याची कुणालाही फिकीर नाही. त्याचबरोबर, जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीतही घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीचा गोडाऊन कृषी केंद्राला भाड्याने दिल्यामुळे ट्रक आत येताना मुख्य गेटच तोडून आत शिरला, ज्यामुळे ग्रामपंचायतीच्या गेटचे नुकसान झाले. या फुटलेल्या गेटमुळे गुरेढोरे गावात आत घुसतात आणि तिथेच थांबतात. त्यामुळे नागरिकांना जाण्या-येण्यास त्रास होत आहे आणि विशेष म्हणजे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ग्रामपंचायतीचं गेट गेल्या दीड वर्षांपासून बसवलेलं नाही, आणि त्या जागेला काही गैरप्रवृत्ती लोकांनी जुगार आणि धूम्रपानाचा अड्डा बनवलाय. रात्रीच्या वेळी या शासकीय इमारतीत धुम्रपान, गप्पा आणि जुगाराच्या मैफिली रंगताना दिसतात. या सर्वामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
नागरिकांचा प्रश्न एकच – “ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावाचा विकास का थांबवला जातोय?” कामरगावकरांचा आवाज आता प्रशासनापर्यंत पोहोचेल का, हाच खरा प्रश्न आहे.



