Latest NewsPune

पुण्यातील भाटघर धरणातील पाण्याला अचानक हिरवा रंग; नागरिक घाबरले, अखेर समोर आलं कारण

पुणे : भोर तालुक्यातील भाटघर धरणातील पाण्याला अचानक हिरवा रंग आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून धरणाच्या पाण्याचा रंग बदलल्याचे स्पष्टपणे दिसत असून, सकाळच्या सुमारास पाण्यावर हिरवट तवंग तयार होतो आणि तो दुपारपर्यंत टिकतो.

पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणाच्या उत्तरेकडील बाजूस तसेच संगमनेर, माळवाडी आणि नऱ्हे गावांच्या किनाऱ्यावर पाण्याचा रंग बदलल्याचे निदर्शनास आले आहे. या जलाशयातून भोर शहरासह परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, धरणात मत्स्यपालनासाठी काही खासगी व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली आहे.

हे व्यावसायिक मास्यांना खाद्य टाकत असून, त्यामुळेच पाण्याला हिरवा रंग येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाण्यातील तवंग हटवण्यासाठी आवश्यक उपाय तातडीने राबवण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात माहिती देताना जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश टेंगळे यांनी सांगितले की, “मत्स्यपालनासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यांमधील खाद्यपदार्थांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असल्याने पाण्यात शेवाळ वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते. त्यामुळेच जलाशयातील पाण्याला हिरवा रंग येतो. मात्र ही स्थिती काही कालावधीनंतर नैसर्गिकरीत्या पूर्ववत होते.” प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पाणी सुरक्षित असल्याचे निष्पन्न होईपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button