राज्यस्तरीय गांधीतीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेत शंकर विद्यालयाचा राज्यस्तरावर डंका
चांदुरबाजार : नशंकर विद्यालय तळवेल (तालुका चांदुरबाजार) यांनी राज्यभरातून घेतलेल्या गांधीतीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेत ग्रामीण विभागातून तिसरा क्रमांक पटकावत एक अभिमानास्पद यश संपादन केले आहे. गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या विद्यमाने आयोजित या स्पर्धेत शाळेला रु. २१,००० रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे पुरस्कार स्वरूप लाभले.
जळगाव येथे पार पडलेल्या या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात जैन समूहाचे विश्वस्त अशोक जैन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कारणवाल, सागर मित्र चळवळीचे विनोद बोधनकर, राज्य सल्लागार परिषदेचे किशोर बोरनारे, अंबिका जैन आणि मुख्य समन्वयक गिरीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्काराचे श्रेय ‘पूर्णामाय’ स्वच्छता अभियानाला
या यशामागे शाळेने कुरळ पूर्णा येथील नदीपात्रात राबवलेले ‘पूर्णामाय स्वच्छता व निर्माल्य संकलन अभियान’, तसेच वर्षभरातील विविध स्वच्छता उपक्रम हे प्रमुख कारण असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले. शाळेच्या वतीने डॉ. तुषार देशमुख यांनी हा सन्मान स्वीकारला.
संस्थेचे अभिनंदन व गौरव
या गौरवप्राप्त यशाबद्दल श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, सचिव नरेंद्रराव देशमुख, सदस्या जयश्रीताई देशमुख, रविराज देशमुख, माजी मुख्याध्यापक डी. बी. वानखडे, प्रभारी मुख्याध्यापक भास्कर काळे, ज्येष्ठ शिक्षिका सुचिता फुटाणे, विजय पांडे, प्रिया देशमुख, कविता देशमुख, माया मंगळे, कर्मचारी गजानन साबळे, तसेच पूर्णामाय अभियानाचे समन्वयक प्रतीक देशमुख आणि सदाशिव देवताळे यांच्यासह गावकरी आणि पालकवर्गाने शाळेचे विशेष अभिनंदन केले.



