नागपुरात ८.८८ लाखांची फसवणूक! स्वस्त धान्याच्या आमिषाने व्यावसायिक गंडला; दोन आरोपी अटकेत

नागपूर | प्रतिनिधी
नागपूरच्या यशोधरानगर परिसरात मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून स्वस्त दरात धान्य मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची तब्बल ८ लाख ८८ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शमशुद्दीन उर्फ बबलू अंसारी हे कबाडी व्यवसाय करतात. एका नातेवाईकाच्या लग्नात त्यांची ओळख आरोपी इमरान खान पठाण याच्याशी झाली होती. इमरान खानने आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगत स्वस्त दरात तांदूळ आणि तूरडाळ मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
या आमिषाला बळी पडत फिर्यादीने आरोपींवर विश्वास ठेवला. १५ मार्च २०२५ ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत आरोपींनी साथीदारांसह संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. स्टॅम्प पेपरवर करारनामा करून फिर्यादीकडून एकूण ८ लाख ८८ हजार ५०० रुपये रोख घेतले.
इतकंच नव्हे तर धान्य वाहतुकीसाठी फिर्यादीचा ऑटो रिक्षा (MH 49 D 7005) देखील आरोपींनी ताब्यात घेतला. मात्र, ना धान्य पुरवण्यात आले, ना वाहन परत करण्यात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपी इमरान खान पठाण आणि विकास साहू उर्फ गजभिये यांना अटक केली आहे. इतर आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अधिक तपास सुरू असून या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.



