धक्कादायक आकडे! परदेशात दररोज २० हून अधिक भारतीय कामगारांचा मृत्यू; गल्फ देशांत सर्वाधिक मृत्यू

नवी दिल्ली | प्रतिनिधी
परदेशात काम करणाऱ्या भारतीय कामगारांच्या परिस्थितीबाबत धक्कादायक आकडे समोर आले आहेत. मागील पाच वर्षांत दररोज सरासरी २० हून अधिक भारतीय कामगारांचा परदेशात मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारच्या आकडेवारीतून उघड झाली आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती सादर केली. त्यानुसार, २०२१ ते २०२५ या कालावधीत एकूण ३७,७४० भारतीय कामगारांचा परदेशात मृत्यू झाला आहे.
या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये सर्वाधिक म्हणजे ८,२३४ कामगारांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, या मृत्यूंपैकी तब्बल ८६ टक्क्यांहून अधिक मृत्यू गल्फ देशांमध्ये झाल्याचे समोर आले आहे.
मात्र, या मृत्यूंची नेमकी कारणे काय होती, याबाबत सरकारकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेबाबत आणि कामाच्या अटींबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या पार्श्वभूमीवर परदेशात काम करणाऱ्या भारतीय कामगारांसाठी अधिक सुरक्षितता उपाययोजना आणि कल्याणकारी धोरणांची गरज अधोरेखित होत आहे.



