नागपूर जिल्हा परिषदेला ई-गव्हर्नन्समध्ये राज्यस्तरीय गौरव; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

मुंबई/नागपूर (प्रतिनिधी):
शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष मोहिमेत आणि सेवाकर्मी कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नागपूर जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर विशेष गौरव प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेने डिजिटल, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने प्रभावी कामगिरी नोंदवली.
ई-गव्हर्नन्स मोहिमेत Website Compliance, Aaple Sarkar, e-Office, Dashboard, WhatsApp Chatbot, AI/Blockchain आणि GIS या विविध निकषांवर जिल्हा परिषदेला उल्लेखनीय यश मिळाले आहे.
तसेच “सेवाकर्मी” उपक्रमांतर्गत आकृतिबंध, सेवाप्रवेश नियम, अद्ययावत ज्येष्ठता सूची, पदोन्नतीनुसार नियुक्ती, सरळसेवा रिक्त पदे, बिंदुनामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती, iGOT पोर्टल नोंदणी व प्रशिक्षण, तसेच सेवापुस्तक अद्ययावतीकरण या महत्त्वाच्या बाबींमध्येही लक्षणीय प्रगती साधण्यात आली आहे.
या उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेमार्फत तंत्रज्ञानाधारित, शिस्तबद्ध, उत्तरदायी आणि परिणामकारक प्रशासन अधिक सक्षम झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी म्हणाले, “ई-गव्हर्नन्स आणि सेवाकर्मी सुधारणा यांच्या माध्यमातून नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर सातत्याने भर दिला जाईल.”



