अंबरनाथमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला नालेसफाईच्या तक्रारीवरून मारहाण…

अंबरनाथ:-अंबरनाथमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला नालेसफाईच्या तक्रारीवरून मारहाण. अंबरनाथमध्ये नालेसफाईची तक्रार केल्याच्या रागातून भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अंबरनाथ पश्चिमचे भाजप सचिव श्रीनिवास आदीमूलम यांनी स्वामीनगर परिसरातील एका नाल्याची अयोग्य पद्धतीने सफाई झाल्याची तक्रार नगरपालिकेकडे केली होती. त्यांनी तक्रारीसोबत नाल्यात कचरा असल्याचे फोटोही पाठवले होते. पावसाळ्यात नाल्याचे पाणी घरात शिरू नये यासाठी त्यांनी योग्य नालेसफाईची मागणी केली होती.
त्यांनी केलेल्या याच तक्रारीचा राग मनात धरून, रात्रीच्या वेळी तीन जणांनी त्यांना भररस्त्यात अडवून मारहाण केली. “तक्रार का केली?” असे विचारत या आरोपींनी श्रीनिवास आदीमूलम यांना टी-शर्ट फाटेपर्यंत मारले. त्यावेळी काही नागरिकांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी तोपर्यंत मारहाण सुरूच ठेवली.
या घटनेमुळे अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे. श्रीनिवास आदीमूलम यांनी याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



