महामार्गालगतच्या उघड्या विहिरी जीवघेण्या; पदमावतीतील अपघातानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष?

पंधरा दिवसांपूर्वी कार विहिरीत कोसळून दोघांचा मृत्यू; कमकुवत लाकडी कठड्यांऐवजी मजबूत सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी
भोकरदन : तालुक्यातील महामार्गाच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरी वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वालसावंगी ते पदमावती तसेच पारध-पिंपळगाव रेणुकाई मार्गे भोकरदनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लाकडी कठडे अत्यंत कमकुवत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी पदमावती गावाजवळ कार विहिरीत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या उघड्या विहिरी आणि त्याभोवती असलेले कमकुवत कठडे यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश, धुके किंवा वाहनावरील नियंत्रण सुटल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाकडून या विहिरींच्या सुरक्षेसाठी लाकडी कठडे उभारण्यात आले आहेत. मात्र हे कठडे मजबूत नसल्याने वाहनाचा धक्का लागल्यास ते सहज तुटण्याची शक्यता असल्याचा दावा वाहनधारकांनी केला आहे. त्यामुळे ही सुरक्षा व्यवस्था केवळ नावापुरतीच असल्याची टीका होत आहे.

पदमावती गावाजवळ काही दिवसांपूर्वी कार विहिरीत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर संबंधित बांधकाम विभाग, कंत्राटदार आणि प्रशासनाने धोकादायक विहिरींची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महामार्गालगत असलेल्या विहिरींना लोखंडी क्रॅश बॅरियर किंवा मजबूत सिमेंटचे संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अपघाताची पुनरावृत्ती होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन धोकादायक विहिरींच्या ठिकाणी मजबूत संरक्षक कठडे बसवावेत. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी महामार्ग रोखून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब वानखेडे यांनी दिला आहे.
एका अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे प्रशासन आता आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार की धोकादायक विहिरींवर कायमस्वरूपी सुरक्षात्मक उपाययोजना करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.



