गणेशोत्सवापूर्वीच वाशिमच्या मुख्य विसर्जन मार्गाची दुरवस्था; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

शिवाजी महाराज चौक ते दिघेवाडी चौक मार्गावर ठिकठिकाणी खड्डे; अपघाताचा धोका वाढल्याने प्रशासनाकडे लक्ष
वाशिम | प्रतिनिधी
वाशिम शहरातील शिवाजी महाराज चौक ते दिघेवाडी चौक हा गणेशोत्सवातील शेकडो गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांचा प्रमुख मार्ग मानला जातो. मात्र सध्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील हा मार्ग गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून दरवर्षी हजारो भाविक, गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि वाहनचालक या मार्गाचा वापर करतात. मात्र सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी पाणी साचत आहे.
खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढत असून अपघाताचा धोका अधिक गंभीर बनला आहे. नागरिकांनाही या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गणेशोत्सव काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने रस्त्याची सद्यस्थिती चिंतेचा विषय ठरत आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास विसर्जन मिरवणुकांदरम्यान मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, वाहतूक सुरक्षित करावी आणि गणेशोत्सवापूर्वी विसर्जन मार्ग सुस्थितीत आणावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
गणेशोत्सवासारख्या मोठ्या सार्वजनिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने तातडीने या समस्येची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



