Amaravti GramincitynewsLatest NewsMaharashtra

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या निषेधार्थ परतवाड्यात भव्य मोर्चा

जंतर-मंतरवरील कथित लाठीमाराचा निषेध; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

परतवाडा | प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि पोलिस कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी परतवाडा शहरात हजारो विद्यार्थ्यांनी भव्य निषेध मोर्चा काढला. जयस्तंभ चौकातून सुरू झालेला मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. यावेळी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली तसेच नीट (NEET) परीक्षेशी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढत शासनाच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला.

मोर्चा जयस्तंभ चौकातून अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी मंडळाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी बळवंत आरखराव यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनामध्ये दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईची निष्पक्ष चौकशी करावी, विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवावी, शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावेत तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली.

मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शहरातील काही भागात वाहतुकीवर अल्पकाळ परिणाम झाला. मात्र, आंदोलन शांततेत पार पडल्याची माहिती मिळाली.

परतवाड्यातील या विद्यार्थी आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा होत असून, विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्यांवर प्रशासन आणि केंद्र सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button