दिल्ली लाल किल्ला स्फोट: दोषींना न्यायाच्या कटघऱ्यात उभं केलं जाईल — पंतप्रधान नरेंद्र मोदी

थिम्पू/नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (११ नोव्हेंबर २०२५) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत, या स्फोटातील सर्व कटकारस्थान रचणाऱ्यांना न्यायाच्या कटघऱ्यात उभं केलं जाईल, असे स्पष्ट केले. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले आहेत.
भूतानच्या चांगलिमिथांग मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “दिल्लीतील सोमवारी झालेला भीषण स्फोट संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे. या घटनेत निर्दोष लोकांचा बळी गेला असून, दोषींना कधीही माफी मिळणार नाही.”
मोदी पुढे म्हणाले की, ते गेल्या रात्रीपासून तपास यंत्रणा आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात होते. त्यांनी सांगितले की, “भारत सरकार या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे आणि दोषींवर कठोर कारवाई होणार आहे.”
पंतप्रधानांनी पीडित कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.



