कृषिमंत्रिपदावरून माणिकराव कोकाटेंना हटवले; अजित पवारांचा डाव यशस्वी, दोन उद्दिष्टे साध्य! नेमकी घडामोड काय?

विधिमंडळात रमी खेळताना दिसलेल्या माणिकराव कोकाटे यांची शेवटी कृषिमंत्रिपदावरून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जवळील कृषी विभागाचा कार्यभार आता काढून घेण्यात आला आहे. कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे यांच्या ताब्यात असलेले क्रीडा आणि युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला आहे. तर दत्तात्रय भरणे हे राज्याचे नवीन कृषिमंत्री असतील.
विरोधकांकडून कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खातेबदल करत त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले असले, तरी ही बदली त्यांच्यासाठी एक प्रकारचा धोक्याचा इशारा मानला जात आहे.
अजित पवारांचा डाव यशस्वी; एका निर्णयातून साधली दोन उद्दिष्टे, नेमकं काय घडलं?
खातेबदलावर विरोधकांनी टीका केली असली, तरी अजित पवारांनी आपल्या खेळीने दोन महत्त्वाचे मुद्दे हाताळलेत. क्रीडा आणि युवक कल्याण विभाग मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणे हे काहीसे नाराज असल्याची चर्चा होती. खातेवाटपानंतर त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्तही केली होती.
मात्र आता माणिकराव कोकाटेंवर झालेल्या कारवाईमुळे भरणेंना थेट कृषी मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. हा खातेबदल त्यांच्या दृष्टीने एक सुवर्णसंधी मानली जात आहे. अजित पवारांनी एका बाजूला कोकाटेंचं खातं बदलून कारवाई केल्याचा संदेश दिला, तर दुसरीकडे आपल्या जवळच्या सहकाऱ्याला महत्त्वाचं खातं देऊन नाराजीही दूर केली. त्यामुळे हा निर्णय ‘एका निशाण्यावर दोन लक्ष्य’ साधणारा ठरला आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार 21 डिसेंबर 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात आली आहे.



