उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी: भेटीचे कारण काय?

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (19 जुलै) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील मैत्री या निवासस्थानी पोहचले. यावेळी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. संजय राऊतांच्या आईची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहचल्याची माहिती समोर येत आहे.
संजय राऊत कारागृहात गेल्यानंतर त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे पोहचले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे पुन्हा संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी भेटीला पोहचले. आजची भेट ही देखील खासगी भेट सांगितली जात असून संजय राऊत यांच्या आईला भेटण्यासाठी उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरेंसह पोहचले.
सामनाला दिलेल्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा प्रहार-
केंद्रीय निवडणूक आयोगावर ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. सामनाच्या महामुलाखतीत उद्धव ठाकरेंनी आयोगावर टीका केलीय. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना नाव, चिन्हं इतरांना देण्याचा धोंड्याला अधिकार नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तसंच देश अशांत, अस्थिर ठेवायचा हेच भाजपचं धोरण आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 75 वर्षे भरत असल्याचा इशारा सरसंघचालकांनी दिलाय, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसभेचा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर देखील भाष्य केलं आहे. जे तुम्ही लोकसभेला कमावलंत, ते विधानसभेला गमावलंत. फक्त सहा महिन्यांत हे कसं घडलं?, असा प्रश्न संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. ‘तू तू मैं मैं’ झालं. त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.



