अक्कलकोट येथील हल्ल्याचा नांदेडमध्ये निषेध; संभाजी ब्रिगेडचे तीव्र आंदोलन

नांदेड : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या हल्ल्याचा राज्यभर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड आणि समविचारी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सहभागी आंदोलकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत बहुजन चळवळीला संपविण्याचा कट रचल्याचा आरोप केला. तसेच सरकार हल्लेखोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत, “संभाजी ब्रिगेड जशास तसे उत्तर देईल,” असा इशाराही दिला.
आंदोलनात नानासाहेब जावळे पाटील यांची रोषपूर्ण प्रतिक्रिया
छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्यांनी म्हटलं की –
“प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मराठा समाजात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. ज्यांनी हल्ला केला त्यांचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. जे मराठा समाजासाठी लढतात त्यांच्यावरच षडयंत्र केलं जात आहे.”
“जे कोणी मराठा समाजाविरोधात बोलेल त्याला पायाखाली घालून तुडवू. कोरडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अपशब्द वापरले तरी त्यांच्यावर कारवाई झाली नाही. जर सरकार हल्लेखोरांचा बंदोबस्त करत नसेल, तर मग मराठा समाज सरकारचा बंदोबस्त करेल.”
प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी
आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन उग्र करण्याचा इशारा दिला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही केली नाही, तर समाजबांधव सड्यावर उतरतील, असा इशाराही दिला.



