AdyalGramPanchayatBhandaraBreakingNewsBreakingNewsMaharashtracitynewsLatest NewsMaharashtraMaharashtraNews

अड्याळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप! रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य; मंत्र्यांकडे थेट तक्रार

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ ग्रामपंचायतीच्या कथित निष्क्रिय कारभारामुळे अशोक नगर परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक रस्त्यांवर पडून असलेले कचऱ्याचे आणि शेणखताचे ढिगारे, परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि वाढलेला साथीच्या आजारांचा धोका यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत नागरिकांनी थेट राज्याच्या मंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याच्या अड्याळ गावातील अशोक नगर परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक रस्त्यालगत काही व्यक्तींकडून सर्रासपणे कचरा आणि शेणखत टाकले जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढिगारे साचले असून परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत आहे. विशेष म्हणजे याच मार्गाचा वापर दररोज शेकडो विद्यार्थी, महिला आणि नागरिक करतात. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

पावसाळा तोंडावर असताना साचलेल्या कचऱ्यातून डेंग्यू, मलेरिया, अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तोंडी तसेच लेखी तक्रारी करण्यात आल्या. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

“सुंदर गाव, स्वच्छ गाव” या शासनाच्या घोषणेची अंमलबजावणी केवळ कागदोपत्रीच राहिली असून प्रत्यक्षात परिसरात अस्वच्छतेचे चित्र दिसत असल्याची टीका स्थानिकांनी केली आहे.

स्थानिक प्रशासनाकडून न्याय मिळण्याची आशा संपल्याने अशोक नगर येथील रहिवासी मनोज शांतलवार यांनी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांकडे लेखी तक्रार सादर केली आहे.

कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, परिसर तात्काळ स्वच्छ करण्यात यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

आता या गंभीर प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, नागरिकांच्या मागण्यांवर कितपत कार्यवाही होते आणि अड्याळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button