NEET पेपरफुटी प्रकरणावरून NSUI आक्रमक; अमरावतीत ५ जूनला मशाल मोर्चाची घोषणा

अमरावती | प्रतिनिधी
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली असून, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेविरोधात आंदोलनाची धार तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने अमरावतीत भव्य मशाल मोर्चाची घोषणा केली आहे.
शुक्रवार, ५ जून रोजी आयोजित करण्यात येणारा हा मशाल मोर्चा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ काढण्यात येणार असल्याची माहिती NSUI पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना पदाधिकाऱ्यांनी NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही NSUI च्या वतीने करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी मागे हटणार नसल्याचा इशाराही संघटनेने दिला.
NSUI च्या या आंदोलनामुळे अमरावतीतील विद्यार्थी आणि युवकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, या मोर्चाला किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात विविध विद्यार्थी संघटना आक्रमक भूमिका घेत आहेत. अमरावतीत होणारा मशाल मोर्चा हा विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागणीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, या आंदोलनानंतर केंद्र सरकारची भूमिका काय राहते याकडेही लक्ष लागले आहे.



