पाण्याचा सातबारा : महाराष्ट्रात प्रत्येक थेंबाचा हिशेब; जलसुरक्षेसाठी सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

आपल्या नावावर किती जमीन आहे हे सातबारा उताऱ्यावरून समजते. मात्र आता गावात आणि शहरात नेमके किती पाणी उपलब्ध आहे, किती वापरले जाते आणि किती वाया जाते याचाही संपूर्ण हिशेब ठेवला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी ‘पाण्याचा सातबारा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि सर्वसामान्यांना त्याचा काय फायदा होणार आहे, पाहूया या विशेष रिपोर्टमधून.
महाराष्ट्रात दरवर्षी पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होताना दिसत आहे. भूजल पातळी खालावत आहे, विहिरी कोरड्या पडत आहेत आणि अनेक गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘पाण्याचा सातबारा’ ही संकल्पना पुढे आणली आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक गाव आणि शहरातील पाण्याचे संपूर्ण वॉटर ऑडिट केले जाणार आहे. गावातील विहिरी, बोअरवेल, तलाव, बंधारे आणि नद्यांमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याची माहिती संकलित केली जाईल. यासोबतच जमिनीतून किती पाणी उपसले जाते आणि पावसाच्या माध्यमातून किती पाणी पुन्हा जमिनीत मुरते याचाही ताळेबंद तयार केला जाणार आहे.
सरकार प्रत्येक गावासाठी स्वतंत्र वॉटर बजेट आणि वॉटर रिचार्ज चार्ट तयार करणार आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा निर्माण होण्यापूर्वीच उपाययोजना करणे शक्य होणार आहे. पाण्याचा वापर, साठवण आणि पुनर्भरण यांचे अचूक नियोजन करण्यावर या योजनेत भर दिला जाणार आहे.
योजनेअंतर्गत गावागावांत मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे राबवली जाणार आहेत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला अधिक बळ देण्यात येणार असून घरांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे विहिरीत किंवा जमिनीत सोडण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा पायलट प्रोजेक्ट सर्वप्रथम विदर्भ आणि काही निवडक दुष्काळग्रस्त भागांमध्ये राबवला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लागू करण्याचा सरकारचा मानस आहे.
तज्ज्ञांच्या मते, ‘पाण्याचा सातबारा’ ही संकल्पना यशस्वी ठरल्यास भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी आणि जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब ठेवणारी ही महत्त्वाची योजना भविष्यात महाराष्ट्राच्या जलसुरक्षेसाठी किती प्रभावी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तुमच्या गावात रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा जलसंधारणाची कोणती कामे सुरू आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.



