ढाणकीत महावितरणविरोधात जनआक्रोश महामोर्चा; स्मार्ट मीटरला तूर्तास स्थगिती

वाढीव वीजबिले व वीजपुरवठ्याच्या समस्यांवर नागरिकांचा संताप; प्रशासनाकडून लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
यवतमाळ | प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथे स्मार्ट मीटर, वाढीव वीजबिले आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या विरोधात नागरिकांनी गुरुवारी सर्वपक्षीयांच्या नेतृत्वाखाली भव्य जनआक्रोश महामोर्चा काढला. आंदोलनादरम्यान पोलिसांनी ३५ ते ४० आंदोलकांना ताब्यात घेतल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर महावितरणने महत्त्वाचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले.
ढाणकी शहरात महावितरणच्या कामकाजाविरोधात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय, वाढीव वीजबिले, वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे आणि अधिकाऱ्यांच्या कथित निष्क्रियतेविरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत सुमारे ३५ ते ४० आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर महावितरणच्या पुसद विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण यांनी आंदोलनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
चर्चेनंतर महावितरण प्रशासनाने लेखी आश्वासन देत ढाणकी येथे सध्या स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच वाढीव वीजबिलांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल, स्मार्ट मीटर संदर्भात स्वतंत्र समिती स्थापन केली जाईल आणि नागरिकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाही, अशी हमी देण्यात आली.
याशिवाय, सतत गैरहजर राहणाऱ्या एका सहाय्यक अभियंत्यावर वेतनकपातीची कारवाई करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना दिली.
महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जनआक्रोश महामोर्चा शांततेत मागे घेतला. या आंदोलनामुळे स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीसह वीजपुरवठ्याच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते आणि वीजपुरवठा तसेच वाढीव वीजबिलांच्या तक्रारींचे निराकरण किती प्रभावीपणे केले जाते, याकडे ढाणकीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



