“लग्नातून परतताना मृत्यूचा घाला! वाशिममध्ये भीषण अपघातात आई-वडीलांसह १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू”

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर–वाशिम मार्गावर पार्डी टकमोर फाट्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. लग्न समारंभ आटोपून घरी परतणाऱ्या एका कुटुंबावर भरधाव पिकअपने धडक देत आई-वडीलांसह १२ वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.
माहितीनुसार, वारा जहागीर येथील रहिवासी संतोष बबन लांभाडे, त्यांची पत्नी कलावती लांभाडे आणि मुलगा ईश्वर (वय १२) हे गोगरी येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत असताना, आंब्याने भरलेल्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर दूर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाल्याने तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. काही वेळापूर्वी लग्नात आनंद साजरा करणारे हे कुटुंब क्षणार्धात काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे वारा जहागीर गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
आनंदाचे क्षण दु:खात बदलणाऱ्या या घटनेतून वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव पुन्हा एकदा झाली आहे.



