“जिंकलो तर श्रेय, नाहीतर दोष विरोधकांचा” – विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महिला आरक्षण आणि 131व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “जिंकलो तर श्रेय घ्यायचं आणि अपयश आलं की दोष विरोधकांवर ढकलायचा, हीच सरकारची भूमिका आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत सरकार केवळ घोषणा करत आहे, मात्र प्रत्यक्षात ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. 33 टक्के महिला आरक्षणाचा मुद्दा हा केवळ राजकीय फायद्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
131व्या घटनादुरुस्तीबाबत बोलताना त्यांनी सरकारवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. “डिलिमिटेशनचा मुद्दा पुढे करून महिला आरक्षण लांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे ते म्हणाले. तसेच काँग्रेसने नेहमीच महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला असून, सध्याचे सरकार जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेमुळे महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.
महिला आरक्षणाचा प्रश्न प्रत्यक्षात कधी मार्गी लागणार, याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.



