“उत्तमसरा ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण; आमरण उपोषण स्थगित, प्रशासनाचे १५ दिवसांत चौकशीचे आश्वासन”

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील उत्तमसरा ग्रामपंचायतीत कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. अभिषेक सवाई यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर तात्पुरता विराम मिळाला.
ग्रामपंचायतीतील व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत सवाई यांनी साडेतीन दिवसांपूर्वी उपोषण सुरू केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही त्यांची प्रमुख मागणी होती. आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असताना ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आंदोलनाला जोरदार पाठिंबा दिला, त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला होता.
या पार्श्वभूमीवर पंचायत विभागाने हस्तक्षेप करत १५ दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून दोषींवर योग्य कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतर अभिषेक सवाई यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
उपोषणाची सांगता करताना तुषारभाऊ भारतीय, ठाणेदार सुनील चव्हाण, बडनेरा पोलीस निरीक्षक, जिल्हा परिषद अमरावतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी भातकुली, तहसीलदार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, प्रशासनाचे आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते, चौकशी निष्पक्ष होते का आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.



