राळेगाव–पांढरकवडा परिसरात मुली बेपत्ता प्रकरणाने खळबळ; भाजप नेते आणि मंत्र्यांची पोलीस ठाण्यात तक्रार

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव–पांढरकवडा परिसरात काही मुली बेपत्ता झाल्याच्या कथित प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल चव्हाण आणि मंत्री अशोक उईके यांनी राळेगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे.
या प्रकरणात काही मुलींना फसवून नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर राजकीय पातळीवरही हालचाली सुरू झाल्या असून, संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी होत आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये काही संशयितांची नावे समोर आली असून, संबंधितांना राळेगाव पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात दोन वेगवेगळ्या टोळ्या कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या टोळ्यांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मुलींना फसवून त्यांचे लग्न लावून देणे आणि त्यानंतर त्यांना माहेरी परत येऊ न देणे, अशा प्रकारचे कथित प्रकार उघडकीस येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, एका प्रकरणात बालविवाह झाल्याचेही समोर आले असून, या संदर्भात पाच जणांची नावे पुढे आली आहेत. या सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तसेच, ‘मदर कुरेशी’ नावाच्या एका व्यक्तीचे नावही या प्रकरणात संशयित म्हणून समोर आले आहे. त्याच्याविरोधात पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या संपूर्ण रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
या प्रकरणामुळे यवतमाळ जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात असून, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



