पुण्यात पर्यावरणीय आपत्ती! पाषाण तलावात हजारो मासे मृत – चार अधिकारी निलंबित, मुख्य अभियंत्याला नोटीस

पुण्यातील निसर्गरम्य पाषाण तलाव येथे मोठ्या प्रमाणावर मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करत चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
या प्रकरणात मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार वायसे, कनिष्ठ अभियंता अतुलकुमार कट्स, तसेच औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक विजय भोईर आणि विनायक चोपडे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय, विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. तलावाजवळ उभारण्यात आलेला १ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) प्रत्यक्षात कार्यरत नसल्याचे उघड झाले. केवळ कागदोपत्री सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट तलावात सोडले जात होते.
या विषारी सांडपाण्यामुळे तलावातील ऑक्सिजनची पातळी घसरली आणि जलचरांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे केवळ पर्यावरणालाच मोठा फटका बसला नाही, तर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या या ‘अॅक्शन मोड’मुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, पर्यावरणासंदर्भात निष्काळजीपणा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.



