स्पर्धा परीक्षा देणारे निराश होतील, माझ्या आत्महत्येची बातमी पत्रकारांना देऊ नका, UPSC ची संधी हुकल्याने बालविकास अधिकाऱ्याची गळ्याला दोरी
यूपीएससी परीक्षेची शेवटची संधी हुकल्यामुळे एका 36 वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.
लातूर :लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यूपीएससी परीक्षेची शेवटची संधी हुकल्यामुळे एका 36 वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. लातूरमध्ये एका लॉजवर गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या अधिकाऱ्याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईट नोट देखील आढळून आली आहे. या प्रकरणी लातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रामदास श्रीरामे (रा. कमळेवाडी, ता. मुखेड, जि.नांदेड) असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रामदास श्रीरामे हे अमरावतीला ट्रेनिंग जातो, असे सांगून ते घरातून निघाले होते. यानंतर ते लातूर मध्ये पोहोचले आणि एका लॉजवर त्यांनी भाड्याने रुम घेतली होती. पहिल्या दिवसाचे रूमचे भाडे देखील रामदास श्रीरामे यांनी दिले होते. मात्र, दुसऱ्या दिवसाचे पैसे बाकी असल्याने लॉजवरील कामगाराने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. यावेळी आतून कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
पोलिसांना आढळली सुसाईड नोट
यानंतर लॉजवरील कामगाराने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घात्नासाठली दाखल झाले. पोलिसांकडून रामदास श्रीरामे यांच्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी रामदास श्रीरामे यांनी गळफास घेतल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी खोलीची झाडाझडती घेतली असता त्यांना एक सुसाईट नोट आढळून आली आहे.
यूपीएससीची शेवटची संधी हुकल्याने टोकाचे पाऊल
या सुसाईड नोटमध्ये रामदास श्रीरामे यांनी यूपीएससीची शेवटची संधी हुकल्याने आपण गळपास घेत असल्याचे म्हटले आहे. तसेच, पैशांची समान वाटणी करावी, विशेष म्हणजे माझ्या मृत्यूची बातमी देऊ नका, अन्यथा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण निराश होतील, असा उल्लेख देखील त्यांनी सुसाईट नोटमध्ये केला आहे. दरम्यान, रामदास श्रीरामे यांची लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत गट ‘ब’ संवर्गात बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांनी नागपूर येथे चार महिन्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण केले होते. त्यांना अमरावती येथे बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर रुजू होण्यासाठी आदेश मिळाले होते. परंतु, यूपीएससीची संधी हुकल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.



