Crime NewsLatest News

ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; जागेवर बसण्यावरून वाद, दोनजण जखमी

नंदुरबार :- बस प्रवास किंवा रेल्वेतून प्रवास करताना सीटवर बसण्यावरून वाद होत असल्याचे नेहमीच पाहण्यास मिळते. अशाच प्रकारे ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये बसण्यावरून प्रवाशांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादातीत एकाने दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नंदुरबार रेल्वे स्थानकावर उघडकीस आली आहे. यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

चेन्नईहून जोधपुरकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये आज दुपारच्या सुमारास हि घटना घडली आहे. यात दोन प्रवाशांवर जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान दुपारी ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये भुसावळवरून चढलेल्या एका प्रवाशाची रेल्वेत अगोदरच बसलेल्या दोन राजस्थानी प्रवाशांसोबत बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. रेल्वेतच जोरदार राडा झाल्याने रेल्वेतील अन्य प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

सहकाऱ्यांना बोलावत केला हल्ला

दरम्यान या प्रवाशांमध्ये झालेला वाद काही वेळ थांबला होता. मात्र याचा मनात राग धरून नंदुरबार रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर त्या प्रवाशाने आपल्या काही सहकारी मित्रांना अगोदरच बोलावून ठेवले होते. यानंतर एक्सप्रेस नंदुरबार रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर या दोघांवर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. यात एका प्रवाशाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार केल्याने प्रवासी जखमी झाले आहेत.

रेल्वे स्थानकावर उडाला गोंधळ

नंदुरबार रेल्वे स्थानकावर ताप्ती गंगा एक्सप्रेस थांबताच प्रवाशाने बोलावून ठेवलेल्या सहकार्यांनी आतमध्ये प्रवेश करत धारदार शस्त्राने वार केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बोगीत बसलेल्या अन्य प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. या घटनेबाबत रेल्वे पोलीस दाखल झाले. यानंतर दोन्ही जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे काहीवेळ रेल्वे थांबून होती. मात्र नंतर ताप्ती गंगा एक्सप्रेस जोधपुर कडे रवाना झाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button