आरक्षणाचा आणखी एक बळी, नोकरी न मिळाल्याने उच्चशिक्षित तरुणीने आयुष्य संपवले, गावकरी हळहळले

जालना :- जालन्यातील बदनापूर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याने सुशिक्षित तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुणवत्ता असूनही नोकरी मिळत नसल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील खादगाव येथील रहिवासी असलेली राणी साहेबराव नाईकवाडे (वय २५) ही उच्चशिक्षित आहे. स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता असूनही नोकरी लागत नसल्याने ती खचली होती. मराठा आरक्षण नसल्याने ती नोकरीपासून वंचित होती, त्यामुळेच तिने खादगावातील गणेश नगरात येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.
राणीला लहानपणापासूनच उच्च शिक्षणाचे स्वप्न होते. शाळेत असताना ती अत्यंत हुशार असल्याचेही बोलले जाते. त्यानुसार तिने ग्रॅज्युएशन देखील पूर्ण केले आणि आपण अधिकारी व्हावे, असे स्वप्न उराशी बाळगून ती मागील चार वर्षांपासून पुणे याठिकाणी युपीएससी एमपीएससीची तयारी करीत होती. राणीचे आई-वडील हे हलाखीचे जीवन जगत आहेत. परंतु आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी मजुरी करून तिला ते पैसे पुरवत होते. चार वर्षांपूर्वी राणीच्या वडिलांचे कॅन्सरचे ऑपरेशन देखील झाले होते. अशा परिस्थितीत देखील राणीने न डगमगता शैक्षणिक प्रवास सुरु ठेवला. आणि नोकरीसाठीही प्रयत्न करत होती.
मागील चार वर्षाच्या प्रयत्नामध्ये तिला हाती निराशाच आली. तिच्यासोबतच्या मुली कमी गुण मिळवूनही यूपीएससी एमपीएससी करुन कोणी तलाठी तर कोणी ग्रामसेवक झाल्या मात्र तिला मार्क जास्त मिळूनही नोकरी मिळत नसल्याची खंत तिच्या मनात होती.
मागील तीन ते चार दिवसांपूर्वीच ती पुण्याहून आपल्या गावी बदनापूर याठिकाणी राहावयास आली होती. त्यानंतर मात्र दोन ते तीन दिवस राहिल्यानंतर त्याच विचारात होती आणि जर मला आरक्षण मिळाले असते तर मला नोकरी मिळाली असती अशी खंच तिने आई-वडिलांना देखील बोलून दाखवली होती. त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.



