वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपूर्वीच काळाचा घाला; नागपुरात भीषण अपघातात दोन अल्पवयीन मित्रांचा मृत्यू

भरतवाडा वाय पॉईंटजवळ उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक; १७ वर्षीय चालक गंभीर जखमी
नागपूर | प्रतिनिधी
मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तीन मित्रांवर काळाने घाला घातला. नागपुरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पावनगाव ते भरतवाडा वाय पॉईंट मार्गावर पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. इलेक्ट्रिक टाटा कर्व कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
वाढदिवसासाठी निघाले होते तिघे मित्र
पोलिसांच्या माहितीनुसार, मिहीर आनंद बेहार (१७), भौमिक अमोल लारोकर (१६) आणि सागर संजय मेलवाणी (१७) हे तिघे मित्र मित्र जयचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडले होते.
मित्र जयला येण्यासाठी काही वेळ असल्याने तिघेही मिहीरच्या वडिलांच्या इलेक्ट्रिक टाटा कर्व कारमधून परिसरात चक्कर मारत होते. त्यावेळी कार मिहीर बेहार चालवत होता.
उभ्या ट्रकला कारची जोरदार धडक
आज १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास भरतवाडा वाय पॉईंटजवळ कार आली असता रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारमधील भौमिक लारोकर आणि सागर मेलवाणी यांचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला. तर कारचालक मिहीर बेहार गंभीर जखमी झाला.
जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू
अपघाताची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मिहीरला उपचारासाठी तारांगण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर पडलेल्या तीन मित्रांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी पोलिसांनी मर्ग खबरेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास सुरू आहे.
रस्त्यावर ट्रक कोणत्या परिस्थितीत उभा होता, कारचा वेग किती होता आणि अपघातामागील इतर कारणे कोणती होती, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
वाढदिवसाच्या आनंदासाठी घराबाहेर पडलेल्या तीन मित्रांपैकी दोघांचा मृत्यू आणि एकाच्या जीवावर बेतलेला हा अपघात नागपूर शहराला हादरवून गेला आहे.



