कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे झाड कोसळले; तीन कार, दोन दुचाकींचे मोठे नुकसान

सुरक्षा भिंत तोडून पार्किंगमध्ये पडले झाड; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
कल्याण | प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. कल्याण पश्चिमेतील भगवा तलाव परिसरातील शत्रुंजय टॉवरजवळ एक मोठे झाड सुरक्षा भिंत तोडून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळल्याने तीन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मंगळवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण शहरातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याच दरम्यान, कल्याण पश्चिमेतील भगवा तलावाजवळील शत्रुंजय टॉवर परिसरात हे झाड अचानक कोसळले.
झाड कोसळताना सुरक्षा भिंतही कोसळली आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन कार तसेच दोन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट पसरली आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुदैवाने झाड कोसळले त्यावेळी त्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी पोहोचून झाड हटविण्याचे काम हाती घेतले.
या घटनेनंतर शहरातील जुनी व धोकादायक झाडांची नियमित तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी छाटणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



