वृंदावन बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर; दोन सख्ख्या भावंडांचे मृतदेह सापडले, २ जण अद्याप बेपत्ता

वृंदावन : यमुना नदीतील भीषण बोट दुर्घटनेनंतर तिसऱ्या दिवशीही शोककळा कायम असून, मृतांचा आकडा आता १४ वर पोहोचला आहे. रविवारी बचाव पथकांना आणखी दोन मृतदेह सापडल्याने ही संख्या वाढली आहे. अद्याप २ भाविक बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नदीच्या पृष्ठभागावर दोन मृतदेह तरंगताना आढळले. हे मृतदेह पंजाबमधील लुधियाना येथील सख्खे भाऊ-बहिण डिंकी आणि ऋषभ शर्मा यांचे असल्याची ओळख पटली आहे. डिंकी बीए अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती, तर ऋषभ नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता. दोघेही कुटुंबासोबत दर्शनासाठी आले होते.
दरम्यान, मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे फुगून वर आले होते. गोताखोरांनी मोठ्या प्रयत्नानंतर ते बाहेर काढले. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, घाटावर शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
या दुर्घटनेनंतर प्रशासनाने शोधमोहीम अधिक तीव्र केली असून, सर्च ऑपरेशनचा परिसर तब्बल २० किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आला आहे. या मोहिमेत सेना, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पीएसीचे सुमारे २५० जवान सहभागी झाले आहेत.
आतापर्यंत २२ जणांना सुरक्षित वाचवण्यात आले असून, १४ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. उर्वरित २ जणांचा शोध घेण्यासाठी गोताखोरांकडून खोल पाणी आणि झुडपांमध्ये तपास सुरू आहे.
दरम्यान, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शेवटच्या व्यक्तीचा शोध लागेपर्यंत बचावकार्य थांबवले जाणार नाही.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



