City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळमध्ये खळबळजनक उलगडा: प्रेमसंबंधातून तरुणाकडून महिलेची हत्या, ४० हजार मोबाईल डेटा तपासून गुन्हा उघड

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक हत्येचा पोलिसांनी उलगडा केला आहे. प्रेमसंबंधातून एका तरुणाने २६ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले असून, या प्रकरणात आरोपी युवकासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी तासलोट शिवारातील जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तपासाची दिशा वेगाने ठरवत मृत महिलेची ओळख राणी किशोर वानखडे (वय २६, रा. चापडोह) अशी पटवली.

तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश कश्यप (वय २०) याने ११ मार्च रोजी राणीला जंगलात नेले. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने दुपट्ट्याने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतरही खात्री करण्यासाठी चाकूने वार करण्यात आले.

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेहाचा चेहरा जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास केला. तब्बल ४० हजार मोबाईल क्रमांकांचा डेटा तपासण्यात आला, तसेच जवळपास २०० सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात आली. जोडमोहा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

विशेष म्हणजे, इतका गंभीर गुन्हा करूनही आरोपी सामान्यपणे वावरत होता. तो रामनवमीच्या शोभायात्रेतही सहभागी झाल्याचे समोर आले आहे. अखेर पोलिसांनी पाळत ठेवून त्याला अटक केली.

या प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

प्रेमसंबंधातून झालेल्या या हत्येने समाजासमोर गंभीर प्रश्न निर्माण केले असून, पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे गुन्ह्याचा उलगडा झाला असला तरी अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button