अमरावती कॅम्प परिसरात कचऱ्याचा विळखा: प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

अमरावती शहरातील सर्वात महत्त्वाचा आणि गजबजलेला कॅम्प परिसर सध्या कचऱ्याच्या समस्येमुळे चर्चेत आला आहे. स्वच्छतेसाठी ओळखला जाणारा हा भाग आता ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढला गेला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कॅम्प परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि मोठी रुग्णालये असल्याने दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांची वर्दळ असते. मात्र इर्विन चौक ते गर्ल्स हायस्कूल चौक या मुख्य मार्गावर सध्या कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाही. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेषतः शाळा आणि रुग्णालयांच्या परिसरात अशी अस्वच्छता असल्यामुळे विद्यार्थी आणि रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, साचलेल्या कचऱ्यामुळे डास, माशा आणि इतर कीटकांची संख्या वाढली असून, रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातच अशी परिस्थिती असल्याने इतर भागांची अवस्था काय असेल, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
कॅम्प परिसरातील ही समस्या केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून ती नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब बनली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.



