Amaravti GramincitynewsLatest NewsMaharashtra

लाखोंचा निधी, तरीही सांडपाण्याचा विळखा! गोकुळधाम कॉलनीत भ्रष्टाचाराच्या आरोपांवर ‘बेशरम’ आंदोलन

चांदूर बाजार : तालुक्यातील शिरजगाव बंड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोकुळधाम कॉलनीत मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या नाल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने संपूर्ण परिसर दुर्गंधी आणि रोगराईच्या विळख्यात सापडला आहे. याविरोधात संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध म्हणून बेशरमाचे झाड लावून अनोखे आंदोलन केले.

गोकुळधाम कॉलनीतील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून सांडपाणी निचऱ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिक आणि समाजसेवक सुयोग गोरले यांनी नाल्यांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या नाल्यांमधून सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी गटारांचे पाणी साचून राहत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नाल्यांच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून सांडपाणी वाहून जाण्याची प्रभावी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे घराघरातील सांडपाणी नाल्यांमध्येच तुंबत असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

याशिवाय नाल्यांच्या बांधकामादरम्यान टाकण्यात आलेले माती व मलब्याचे ढिगारे अद्याप हटविण्यात आले नसल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून मलेरिया, डेंग्यू आणि इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या कथित उदासीनतेच्या निषेधार्थ नागरिकांनी परिसरात बेशरमाचे झाड लावून अनोखे आंदोलन छेडले.

पावसाळा तोंडावर आला असतानाही नाल्यांची स्वच्छता आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. समस्या तातडीने मार्गी न लावल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच साचलेले गटाराचे पाणी कार्यालयात टाकून निषेध व्यक्त करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

दरम्यान, गोकुळधाम कॉलनीतील हा प्रश्न आता केवळ अस्वच्छतेपुरता मर्यादित राहिलेला नसून तो सार्वजनिक आरोग्य आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा गंभीर विषय बनला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप होत असताना ग्रामपंचायत प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि समस्या सोडवण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button